कॅनरा बँक मिस-सेलिंग प्रकरण:
कॅनरा बँक मिस-सेलिंग प्रकरण:
जर तुम्हाला तुमच्या बँकेतील व्यवस्थापक किंवा कर्मचाऱ्यांवर अंधविश्वास असेल, तर नागपूरमधील ही घटना तुमच्यासाठी सावध करणारी आहे. कॅनरा बँकेच्या एका शाखेत ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला चुकीच्या पद्धतीने विमा पॉलिसी विकण्यात आली. या पॉलिसीची मुदत थेट २१२४ सालापर्यंत म्हणजे तब्बल ९९ वर्षांनंतर होती. बँकेने हे उत्पादन ‘मिस-सेलिंग’च्या प्रकारात विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
नागपूरमधील बंकटलम वी. अय्यर हे अनेक वर्षांपासून कॅनरा बँकेचे ग्राहक आहेत. त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत शाखा व्यवस्थापकाने त्यांना दरवर्षी २ लाख रुपयांचा प्रीमियम असलेली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास प्रवृत्त केले. ९० वर्षांच्या वयात विमा मिळणे कठीण असल्याने व्यवस्थापकाने ‘मास्टर प्लॅन’ सुचवला.
या योजनेअंतर्गत आजोबांनी त्यांच्या मुलीसोबत संयुक्त खाते उघडले, पॉलिसीत मुलीला ‘लाईफ अॅश्युअर्ड’ (विमाधारक) दाखवण्यात आले आणि दरवर्षी २ लाख रुपयांचा हप्ता आजोबांच्या खात्यातून भरला गेला. ही पॉलिसी १०० वर्षांनंतर, म्हणजे २१२४ साली परिपक्व (मॅच्युअर) होणार होती.
सोशल मीडियामुळे प्रकरण उजेडात :
अय्यर यांच्या नातेवाईकाने (सांकेतिक नाव ‘एक्स’) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही पोस्ट शेअर केल्यानंतर हे गंभीर प्रकरण सर्वांसमोर आले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिला विमा हप्ता भरला गेला होता. मात्र दुसरा हप्ता भरण्यासाठी बँकेकडून फोन आल्यानंतर आजोबांना संशय आला. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.
ही पोस्ट व्हायरल होताच नेटीझन्सनी कॅनरा बँक तसेच IRDAI च्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?
सुरुवातीला बँकेने सोशल मीडियावर थातूरमातूर उत्तरे देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढता जनआक्रोश आणि संताप लक्षात घेता, बँकेचे प्रादेशिक प्रमुख आणि शाखा व्यवस्थापक रवीवारी थेट आजोबांच्या घरी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तोडगा काढण्याचे आणि एका आठवड्यात संपूर्ण रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले.
बँकेतून विमा घेताना या गोष्टी नक्की तपासा
अनेकदा बँक कर्मचारी आपले विक्री उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विमा पॉलिसीला ‘गुंतवणूक’ म्हणून सादर करतात. अशा दाव्यांवर थेट विश्वास ठेवू नका.
पॉलिसीची मुदत किती वर्षांची आहे आणि गुंतवलेले पैसे नेमके केव्हा व कसे परत मिळणार आहेत, हे कागदपत्रांवरून स्वतः तपासून घ्या.
कोणताही अर्ज किंवा अटी-शर्ती नीट समजून न घेता कोणत्याही कागदावर सही करू नका.
मोठा आर्थिक निर्णय घेताना कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला नक्कीच माहिती द्या आणि सल्ला घ्या.