अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; दिल्लीत पोलीस तक्रार दाखल
Abhijeet Dipke : अभिजीत दीपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात दिल्लीत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू आहे.
देशाच्या राजकारणातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्लीमध्ये पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. फैजान अन्सारी यांनी ही तक्रार दाखल केली असून, दीपके यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांनी अभिजीत दीपके यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आणि दिल्ली सरकारने केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले. तसेच, अभिजीत दीपके हे वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘एनआयआय’ वृत्तसंस्थेनुसार, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांनी सांगितले की, त्यांनी अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलीस उपायुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार, दीपके यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असून, त्यासंबंधीचे पुरावेही त्यांच्या ताब्यात आहेत.
अन्सारी यांनी दावा केला की, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर हल्ला झाला होता. या दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांत गुन्हेही दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अन्सारी यांनी कौतुक केले. “मी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांना सलाम करतो. त्यांनी राजधानीतील वातावरण बिघडू दिले नाही,” असे ते म्हणाले. तसेच, अभिजीत दीपके हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दीपके यांचे वडील भगवानराव दीपके यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका कनिष्ठ अभियंत्याच्या (ज्युनियर इंजिनीअर) पगारातून मुलाच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, ‘कॉक्रोच जनता पार्टी’शी संबंधित कायदेशीर प्रकरणांसाठी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा करत, या प्रकरणी भारतीय निवडणूक आयोग तसेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडे (CBIC) तक्रार केल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत अभिजीत दीपके यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.