Sanjay Raut : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत पैशांचाच खेळ; संजय राऊतांचा गंभीर आरोप
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या खेळावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही विविध मुद्द्यांवरून कडाडून टीका केली.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शिक्षण व्यवस्थेबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. “पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, तसेच यासाठी टास्क फोर्सही स्थापन करण्यात आली. या विषयावर संसदेत चर्चा सुरू असतानाही सरकारकडून जुन्या सरकारांवर आरोप करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याला विरोधकांनीही ठोस प्रत्युत्तर दिले,” असे राऊत म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “संसदेत राहुल गांधी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, सध्याच्या घडामोडींवर ते सविस्तर भूमिका मांडतील. काल संसदेत जे मुद्दे उपस्थित झाले, त्याला आज प्रभावी उत्तर मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील पेपरफुटीच्या घटनांवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “नीट परीक्षा प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. एमपीएससी, औषध निरीक्षक भरती आणि यापूर्वी टीईटी परीक्षेतील पेपरफुटीमुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर आणखी गंभीर आरोप केले. “आज पुण्यात बनावट पदवी प्रमाणपत्रांचा घोटाळा समोर आला आहे. राज्यातील सुमारे २०० शाळा बंद पडल्या आहेत. नवीन शाळांना परवानगी मिळवण्यासाठी संस्थाचालकांना प्रत्येक टप्प्यावर लाखो रुपयांची मागणी केली जाते, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे चित्र दिसत आहे,” असे ते म्हणाले.
तसेच आंदोलनांवर सरकारची भूमिका आणि विरोधकांवरील टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. “जंतर-मंतरवर आंदोलन झाले की आंदोलनकर्त्यांवर टीका केली जाते. आम्ही सरकारवर प्रश्न उपस्थित केले की आमच्यावरच आरोप केले जातात. मात्र सरकारने विरोधकांवर टीका करण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेतील समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.