“तर मी राजकारणातून बाहेर पडेन…” संजय राऊतांचा नेमका इशारा कुणाला?
“मोदींनी चहा विकल्याचा पुरावा आणा, मी राजकारण सोडेन”; संजय राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा ठोस पुरावा सादर केला, तर आपण राजकारण सोडू, असं आव्हान राऊत यांनी फडणवीसांना दिलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सामान्य कुटुंबातून आलो असून नगरसेवकही होण्याची शक्यता नव्हती, मात्र पुढे मुख्यमंत्री झालो, असं सांगितलं होतं. याच संदर्भात बोलताना फडणवीसांनी नरेंद्र मोदींच्या चहा विकण्याच्या कथेकडेही लक्ष वेधलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, मोदींनी खरोखरच लहानपणी चहा विकला असल्याचा पुरावा कुणी दिला, तर आपण राजकारण सोडू.
“त्या काळात रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हतं”
मोदी ज्या काळात गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकत असल्याचं सांगितलं जातं, त्या काळात संबंधित ठिकाणी रेल्वे स्टेशन किंवा प्लॅटफॉर्म अस्तित्वात होता का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे मोदींनी नेमका चहा कुठे विकला, असा प्रश्नही त्यांनी केला.
राऊत यांनी मोदींच्या बालपणाशी संबंधित विविध कथांवरही उपरोधिक भाष्य केलं. नदीत उडी मारणे, मगरीशी झुंज देणे आणि चहा विकणे अशा कथांना त्यांनी ‘बाललीला’ आणि ‘दंतकथा’ असं संबोधलं. फडणवीस खोटे दावे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“सामान्य कुटुंबातून आलेले अनेक नेते”
देशातील अनेक नेते सामान्य कुटुंबातून पुढे आले आहेत, असंही राऊत यांनी सांगितलं. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं उदाहरण देत त्यांनी सामान्य पार्श्वभूमीतून राजकारण आणि समाजकारणात येणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे, असं म्हटलं.
फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावरही त्यांनी भाष्य केलं. नगरसेवक होण्यापासून मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राच्या जनतेमुळे शक्य झाला असून त्याबद्दल राज्याचे आभार मानायला हवेत, असं राऊत म्हणाले. तसेच धर्माच्या नावावर समाजात विभागणी करण्याचा आरोपही त्यांनी केला.
रॅपिडोमुळे रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न
दरम्यान, रॅपिडो बाइक सेवेमुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील हजारो रिक्षाचालक सामान्य कुटुंबातील असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलं असून रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाला त्यांच्याकडे घेऊन जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. यासाठी सरनाईक यांच्याकडे वेळ मागितल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
रॅपिडो कंपनीकडून काही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व दिलं जात असल्याचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का?” असा सवाल करत त्यांनी रिक्षाचालकांच्या हितासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.